१० डिसेंबर, २०१०

टीव्ही नावाचा सैतान





* माझी मुलगी सात वर्षांची आहे. सध्या सुट्टी सुरू झाल्यापासून तिचा एकच उद्योग असतो, टीव्ही बघणं. सकाळपासून रात्रीपर्यंत जवळजवळ सहा तास ती

टीव्हीच बघते. टीव्ही बंद केला, की जोराजोराने आरडाओरडा करते... आदळआपट करते. नाइलाजाने तिला टीव्ही बघू द्यावाच लागतो. तिचं जेवणही तिथेच चालतं. आम्हाला असहाय्य वाटतं. तिचं टीव्ही पाहणं आम्ही कसं थांबवू?

पहिली गोष्ट म्हणजे त्यातला 'नाइलाजाचा', 'असहाय्यतेचा' भाग तुम्हाला वजा करावा लागेल. स्वत:च्या असहाय्यतेकडे तुम्ही पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तिच्या हट्टाला घाबरताय आणि त्यालाच 'नाइलाज' आणि 'असहाय्यता' म्हणताय. काही बाबतीत तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. मुलांची ऊर्जा सक्रियतेने वापरली जाणं महत्त्वाचं असतं. नाहीतर ती आळसावतात आणि निष्क्रिय बनतात. पालकांनी मुलांना दिलेला वेळ ही मुलांसाठी पर्वणी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची गुंतवणूक असते. तुमच्या मुलीला तुमचा वेळ वेगळया तऱ्हेने मिळणं आवश्यक आहे. जर तुम्ही तिच्याशी खेळलात, तिच्याशी गप्पा मारल्यात, तिला ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टी करायला तिला जास्त वाव दिलात, तर तिची ऊर्जा विधायक दिशेने वळेल. आपोआपच टीव्ही बघण्यासारख्या निष्क्रिय कामासाठी तिच्याकडे कमी ऊर्जा शिल्लक राहील. त्यातून तुमचं आणि तिचं नातंही निरोगी होईल. तुम्हाला तिचा टीव्ही 'थांबवायचा' नाही तर टीव्हीला चांगले पर्याय निर्माण करायचे आहेत, ज्यामुळे तिची टीव्हीची गरज कमी होईल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील व्हावं लागेल. तिच्यात बदल होईपर्यंत धीर धरावा लागेल आणि मुख्य हणजे तिच्या आक्रस्ताळ्या तंत्रांना बळी पडणं थांबवावं लागेल.





* माझा मुलगा चार वर्षांचा आहे आणि मुलगी दोन वर्षांची आहे. त्यांना आम्ही शक्यतो टीव्हीपासून लांब ठेवतो. टीव्ही ही आम्हाला पुढे जाऊन त्यांच्यासाठी समस्या व्हायला नकोय. आम्ही काय खबरदारी घेऊ?

तुम्ही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन! तुम्हाला अभिप्रेत असलेल्या 'खबरदारी'बद्दल अमेरिकन बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्या सांगतो, टीव्हीला घराच्या सजावटीत सर्वात मध्यवतीर् स्थान नसावं. टीव्ही बेडरूममध्ये नसावा. टीव्हीवरचे कुठले कार्यक्रम मुलांनी बघावेत, हे पालकांनी ठरवावं. (सध्याचे आपल्याकडचे टीव्हीवरचे कार्यक्रम विचारात घेता ही निवड सुज्ञ पालकांसाठी फारच सोपी आहे. निदान ९० टक्के कार्यक्रम आपोआप बाद होतील!). मुलांनी टीव्ही किती वेळ बघावा, हेही महत्त्वाचं आहे. लहान मुलं जितका कमी बघतील तितकं चांगलं! मोठ्या मुलांसाठी शाळेच्या दिवशी जास्तीत जास्त एक तास आणि सुटीच्या दिवशी दोन तास (यात कम्प्युटर गेम्स, व्हिडीयो गेम्स हे सर्व आलं.). टीव्हीवरच्या आवडत्या कार्यक्रमांनुसार वेळेचं नियोजन करावं, आपल्याला वेळ आहे म्हणून टीव्ही लावलाय असं होऊ नये. गृहपाठ, खेळ या महत्त्वाच्या कार्यक्रमांनंतरच मुलांनी टीव्ही बघावा. झोपाण्याआधी निदान दोन तास तरी टीव्ही बंद होणं आवश्यक आहे. नाहीतर झोपेवर विपरीत परिणाम होतो. जेवताना (किंवा जेवण्यासाठी लालूच म्हणून) टीव्ही लावून देऊ नये. मुलांबरोबर पालकांनी काही कार्यक्रम बघावेत आणि त्या कार्यक्रमांविषयी मुलांशी चर्चा करावी. यामुळे मुलं कार्यक्रमातून काय घेतात हे कळतं. सर्वांत महत्त्वाचं हेच की पालकांनी स्वत:च्या टीव्ही बघण्याकडे आत्मपरीक्षणात्मक भूमिकेतून बघावं आणि त्यात योग्य ते बदल घडवावेत. आपल्या मुलांबद्दल जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या पालकांसाठी हे सर्व आचरायला कठीण आहे का, हे तुम्हीच ठरवा.

- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ

स्तुती : टॉनिक की विष?

नमस्कार,
सुजाण पालकहो ,
आज बरेच दिवसांनी वेळ हि मिळाला आणि तुम्हाला सांगण्यासारखे काही लेख हि छान तो पुढे देत आहे .


स्तुती : टॉनिक की विष?

माझी मुलगी दहा वर्षांची आहे. अभ्यासात तिची फारशी गती नाही. मी आई म्हणून तिला समजून घेऊ शकते. पण, तिचे वडील तिला सतत यावरून बोलत असतात. माझं म्हणणं

एकच, तिची चित्रकला चांगली आहे, गाणं चांगलं आहे त्याबद्दल तिची प्रशंसा करा. पण, ते ऐकत नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी सांगाल का?

मुलाची आत्मप्रतिमा घडण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा सहभाग असतो. सतत ऐकाव्या लागणाऱ्या टीकेमुळे मुलाची आत्मप्रतिमा नकारात्मक होते. कुठल्याही मुलात काहीतरी चांगलं असतंच. जे चांगलं असतं, त्याचं कौतुक जर पालकांनी केलं तर मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याची आत्मप्रतिमा सकारात्मक व्हायला मदत होते. त्यामधून ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत त्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलायला मदत होते. तुमच्या मुलीमध्ये जे चांगलं आहे त्याला वाव देणं महत्त्वाचं आहे. त्यातून ती खुलेल. तिची मन:स्थिती आनंदी राहील आणि तिचा विकास योग्य दिशेने होईल.

तिच्या वडिलांना मी हेच सांगेन, की तुमची मुलगी तुमच्या तोंडून आलेले तिच्याबद्दलचे चांगले उद्गार ऐकण्यासाठी आतुरलेली आहे यावर विश्वास ठेवा. तिच्या आयुष्यात आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही निश्चितपणे जबाबदार ठरू शकता.

द्य माझा मुलगा चार वर्षांचा आहे. त्याने कुठलीही गोष्ट केली, की त्याला त्याच्याबद्दल खूप जास्त स्तुती हवी असते. आम्ही ती करतोही. पण, आम्हाला सतत भिती वाटते, की त्याचीच त्याला सवय लागेल की काय?

तुमची भिती रास्त आहे. आपण केलेल्या कृत्याची प्रशंसा मुलांनाच काय पण, भल्याभल्यांनाही हवी असते. मुलांच्या कुठल्याही कृत्याबद्दल त्यांची स्तुती केल्यास त्यांना 'आपण केलेलं कृत्य चांगलं होतं' हा संदेश मिळतो. या अथीर् स्तुती एक टॉनिक आहे. पण, स्तुती एखाद्या अंमली पदार्थासारखी असते. तिची चटक लागू शकते. स्तुती आपण कशी करतो आहोत, त्यावर ते अवलंबून असतं. अनेकदा 'तू काय गेट आहेस', 'तुझ्यासारखं कोणी नाही' , 'तुझं अमुक अमुक कसं नेहमीच छान असतं' अशी अवास्तव स्तुती आपण करतो. त्यातून मुलाला आपण नेमकं काय चांगलं केलं ते समजत नाही. 'आपण म्हणजे कुणीतरी सर्वश्रेष्ठ आहोत. आपलं कायम सर्वांनी कौतुकच केलं पाहिजे' ही कल्पना त्याच्या मनात दृढ व्हायला लागते. असं कौतुक नाही मिळालं, की त्याला अंमली पदार्थाची जशी 'विथड्रॉअल्स' येतात तसं काहीसं व्हायला लागतंं. अशा वेळी मुलं चिडचिडी होतात, हट्टी होतात, स्तुती ओरबाडून घ्यायला बघतात आणि अति आत्मकेंदित होतात. म्हणून मुलांची स्तुती करताना जपून करावी!

मुलाने केलेल्या कृत्यातलं काय आणि कसं चांगलं आहे ते सांगावं. उदा. त्याने काढलेल्या चित्रातली रंगसंगती कशी योग्य आहे, त्यातला जिवंतपणा कसा मनाला आनंद देणारा आहे वगैरे गोष्टी त्याला सांगितल्या तर त्याच्या हे लक्षात येईल, की आपण काढलेलं चित्र छान आहे. त्यासाठी त्याला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची गरज नाही. स्तुती करताना हे भान ठेवलं तर त्याचे दुष्परिणाम न होता चांगला उपयोग होईल.

- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ