९ ऑगस्ट, २०११

आदर्श पालक

१.पालकत्वाची व्याख्या : जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. सध्याची पालकाची व्याख्या काय ? जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागड्या शिकवणीवर्गाला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले. याने आपण आपल्या मुलाला भोगी बनवत आहोत. भोगाच्या आधाराने अनेक विकार जन्म घेतात. भोगी व्यक्ती अनेक दोषांना जन्म देते. तर त्यागी व्यक्ती सद्गुणांना जन्म देते. तेव्हा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का ? ‘एखाद्या जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे’, हाच पालकाचा धर्म आहे.

२. आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकत असणे : आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्याा पालकांशी संवाद करावासा वाटत नाही. त्यांना सुचणार्याक नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्यात पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असायला हवा.

३. पालकांच्या मनावर ताण येण्यामागील कारणे

३ अ. सतत भूतकाळात रहाणे : सतत भूतकाळात वावरणारे पालक मुलांशी संवाद साधू शकत नाहीत. मुले सतत वर्तमानकाळात जगतात; म्हणून ती सतत आनंदी असतात. आपण आपल्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आणि घटना सतत आठवत रहातो. ‘शेजार्याीशी घडलेला प्रसंग’, ‘सासूबाई वाईट बोलल्या’, ‘कार्यालयात अधिकारी बोलले’, या विचारांचे ओझे बहुतेकजण वहात असतात. सहाजिकच मुले काही सांगत असतील, तर आपण त्यांचे विचार ऐकण्याच्या स्थितीत नसतो. तेव्हा आपण सतत वर्तमानकाळात रहायला शिकले पाहिजे. आपण भूतकाळाच्या विचारात वावरत असल्याने मुले आणि आपण यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही.

३ आ. नकारात्मक बोलणे : ‘तुला काही येत नाही, तुझा काही उपयोग नाही’, अशा नकारात्मक बोलण्याने मुलांच्या मनावर घाव होतात. एक वेळ स्थूलदेहावर केलेले घाव भरून निघतात; पण जिवाच्या मनावर झालेले घाव आपण भरून काढू शकत नाही. तेव्हा मुलांशी बोलतांना सतत सकारात्मक बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे.

३ इ. स्वतःच्या चुका मुलांसमोर मान्य न करणे : स्वतःच्या चुका मान्य केल्याने मनावरचा ताण अल्प होतो. मुलांच्या मनात आपल्याविषयी आदराचे स्थान निर्माण होते. आपले पाहून मुलेही प्रामाणिकपणे चुका मान्य करायला शिकतात. आपण चूक लपवली, तर प्रथम आपल्या मनावर ताण येतो. मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. ‘बाबा आणि आई स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत, मग मी का कराव्यात’, असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे पालक आणि मुले यांच्यात सूक्ष्म-दरी निर्माण होते.

३ ई. मुलांचे सतत दोष पहाणे : मुलांमधील दोष सतत पाहिल्याने आपल्या मनावर ताण येतो. आपण मुलांचे गुण पहावेत आणि त्यांचे कौतुक करावे. पर्यायाने मुले स्वतःचे दोष स्वीकारून ते घालवण्यासाठी प्रयत्न करतात; पण बरेच पालक मुलांना सतत दोषच दाखवतात. ‘मुलांचे सतत दोषच पहाणे - तणाव आणि मुलांचे सतत गुण पहाणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणले, तर ताण न्यून होण्यास साहाय्य होते.

३ उ. स्वतःची प्रतिमा जपत बोलणे : पालक व्यवहारातील त्यांच्या पदाला चिकटून बोलतात. ते स्वतःला विसरत नाहीत. ‘मी आधुनिक वैद्य आहे’, ‘मी अभियंता आहे’ किंवा ‘मी अधिकारी आहे’, ही प्रतिमा जागृत ठेवून बोलण्याने पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद कदापी होणार नाही. उलट पालकांना ताण येतो आणि मुले ऐकत नाहीत. ‘पालक’ या भूमिकेत येऊन मुलांशी सहजतेने बोलायला हवे. ‘व्यवहारातील प्रतिमा ठेवून बोलणे - ताण आणि मुलांचा पालक म्हणून बोलणे - आनंद’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.

३ ऊ. अधिकारवाणीने बोलणे : आपण मुलांशी बोलतांना अधिकारवाणीने बोललो, तर त्यांना ताण येतो. मुलांना आपले बोलणे आवडत नाही. अधिकारापेक्षा आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे. आपणाला स्वतःलाही कोणी एखादी गोष्ट अधिकारवाणीने सांगितली, तर ती स्वीकारावीशी वाटत नाही. तसेच हे आहे. ‘आधिकारवाणीने बोलणे - तणाव आणि प्रेमाने बोलणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणायला हवे.

३ ए. ‘मुलांमध्ये ईश्वरीतत्त्व आहे’, असा विचार न करणे : ‘प्रत्येक मुलात देव आहे’, याची जाणीव ठेवून संवाद साधायला हवा. मुलातील ईश्वरी तत्त्वाचा आदर करूनच बोलावे. मी ‘व्यक्तीशी बोलत नसून तत्त्वाशी बोलत आहे’, असा सतत विचार केला, तर मुलांशी सहज संवाद होईल आणि तणाव दूर होईल. त्यासाठी ‘व्यक्ती म्हणून बोलणे - तणाव आणि ईश्वरी तत्त्वाशी बोलणे - आनंद’, या सूत्राकडे सतत लक्ष ठेवायला हवे.

३ ऐ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, हे तत्त्व समजून व्यवहार न करणे : पालकांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. आपल्या मुलाची प्रकृती कोणती आहे, त्याची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा. स्पर्धावृत्ती आणि समाजातील स्वतःची प्रतिमा यांनुसार काही पालक मुलांशी व्यवहार करतात. पर्यायाने मुले आणि पालक यांच्यात तणाव निर्माण होतो. असे होऊ नये, याकरिता ‘मुलाची प्रकृती समजून संवाद - आनंद आणि मुलाची प्रकृती समजून न घेता संवाद - तणाव’, हे सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

३ ओ. समजावून न सांगणे : मुलांना प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगावी. सम म्हणजे मुलांच्या स्तराला जाऊन सांगणे. मुलगा पहिलीत असेल, तर पालकांनी त्याच्या स्तराला येऊन संवाद साधावा. यामुळे मुले आपले ऐकतात; पण पालक स्वतःच्याच स्तरावर रहातात. त्यामुळे मुले ऐकत नाहीत. पालकांच्या अहंकारामुळे असे घडते. ‘मुलांच्या स्तराला येऊन बोलणे - आनंद आणि स्वतःच्या स्तराला राहून बोलणे - तणाव’, हे सूत्र आचरणात आणले, तर तणाव न्यून होतो.

३ औ. मुलांशी संवाद नसणे : सध्या मुलांच्या समस्या ऐकून घेणारे कोणीच नसते. पालक म्हणतात, ‘आम्हाला कामे आहेत’, तर शिक्षक म्हणतात, ‘आम्हाला आमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.’ पर्यायाने आज मुलांची फार मोठी मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे पालकांविषयी मुलांच्या मनात आदर आणि विश्वास राहिला नाही. मग मुले ऐकत नाहीत; म्हणून पालकांच्या मनावर ताण येतो. अनौपचारिक बोलल्यामुळे मने जुळतात. याकरिता मुलांशी प्रतिदिन १५ मिनिटे अनौपचारिक बोलणे आवश्यक आहे. यातून मुले मोकळी होतात. ‘प्रतिदिन मुलांशी १५ मिनिटांचे अनौपचारिक बोलणे - आनंद आणि प्रतिदिन अनौपचारिक बैठक नसणे - तणाव’, हे सूत्र लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागल्यास पालक मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात.

३ अं. अपेक्षा करणे : आपण मुलांकडून अपेक्षा ठेवून व्यवहार करत असू, तर मुलांना आपले बोलणे आवडत नाही. त्यांच्यात अहं अल्प असल्यामुळे त्यांना अपेक्षेची स्पंदने कळतात. आपण निरपेक्षपणे त्यांच्याशी व्यवहार करावा. जेथे निरपेक्षता आहे, तेथेच प्रेम आहे. ‘म्हातारपणी मुलगा माझा सांभाळ करील. समाजातील माझी पत टिकविल आणि वाढविल’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा ‘देव माझा सांभाळ करील’, असा विचार करणे योग्य ठरेल; कारण ‘अपेक्षा करून व्यवहार - तणाव आणि निरपेक्षपणे व्यवहार - आनंद.’

पालकांनो, वरील सर्व सूत्रे कृतीत आणल्यानंतर आपण आनंदी होऊ. पर्यायाने आपण सुसंस्कारित पिढी घडवू शकू. ही सर्व सूत्रे कृतीत आणण्यासाठी आपण कुलदेवतेची उपासना करायला हवी. (उपासना सांगावी.)

- श्री. राजेंद्र पावसकर, पनवेल

११ एप्रिल, २०११

आपले मुल

मुलांवर सतत टीका केली तर दोष द्यायला शिकतील

मुलांला वैरभावात राहावे लागले तर ते भाडायला शिकेल

मुल भीतीदायक वातावरणात राहिले तर ते भयभीत व्हायला शिकेल

मुल दयेवर जगले तर ते स्वत:बद्दल दु:ख करायला शिकेल

मुल मत्सरी परिवेशात वाढले तर ते अपराधी व्हायला शिकेल

मुलाला उतेजन दिले तर ते आत्मविश्वास शिकेल

मुलाला सहिष्णुता मिळाली तर ते सोशिकपणा शिकेल

मुलाची स्तुती केली तर ते मर्मज्ञता शिकेल

मुलाला स्वीकाराचे वातावरण लाभले तर त एप्रेम करायला शिकेल

मुलाला पसंती दर्शवली तर ते स्वत:च स्वताला आवडू लागेल

मुलांना जर ओळख प्राप्त करून दिली तर ते ध्येय बाळगायला शिकेल

मुलांना जर न्याय दिला तर ते न्याय करायला शिकेल

मुल जर प्रामाणीकपणा अनुभवेल तर ते खरे पणा शिकेल

मुल जर सुरक्षितता अनुभवेल तर ते स्वत: मध्ये व इतरांवर विश्वास ठेवायला शिकेल

मुल जर मैत्रीपूर्ण वातावरणात राहिले तर ते जगातील चांगुलपणावर विश्वास ठेवायला शिकेल

२१ फेब्रुवारी, २०११

आपण पालकांनी , सुसंस्कारीत पिढी घडवायला हवि

आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्नत करणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. आपल्या मुलावर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्रउभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नएच ठरतील ! प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे सर्वांत पहिले व महत्त्वाचे शिक्षक असतात. एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांशी जमवून घेण्यास प्रथम आई-वडीलच मुलाला शिकवतात. लहापणापासून मुलाला प्रोत्साहन दिले, तर कोणतीही गोष्ट हाताळण्यास ते पटकन शिकते. मुलाला चमच्याने कसे जेवावे इथपासून मलमूत्रविसर्जनानंतर स्वच्छता कशी पाळावी, येथपर्यंत सारे पालक शिकवतात. लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवल्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी जोपासलेल्या छंदांचे ज्ञान त्यांना आपसूक होते.

आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान मुलांना शिकवायला हवे !

अडीअडचणीच्या वेळी कोणावर किती विश्वा स ठेवायचा याचे ज्ञानही मुलांना त्यांचे पालक देऊ शकतात. जिवनातील वेगवेगळया प्रसंगांना कसे तोंड द्यावे, हे पालक त्यांना सांगू शकतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे, हे पालकांनी मुलांना सांगायला हवे. जीवनाचे ध्येय, जीवनाचे आदर्श हे सारे पालकांनी जबाबदारीने व विचारपूर्वक मुलांसमोर मांडायला हवे आणि मुलांनी त्याच्या दिशेने करावयाच्या वाटचालीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही करायला हवे. या वेळी त्यांना काय योग्य व काय अयोग्य हे नेमकेपणाने सांगायला हवे; मात्र त्यांची मते त्यांच्यावर लादता कामा नयेत. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा जरूर द्यावी; मात्र पालकांनी सांगितलेल्या योग्य-अयोग्याच्या संकल्पना या एवढ्या स्पष्ट स्वरूपात त्याच्या मनावर बिंबायला हव्यात की मुलाने गैरवर्तन करताच कामा नये ! थोडक्यात पालकांनी आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना शिकवायला हवे. मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा तात्त्विक मुद्दा असू दे किंवा त्यांना शिकवायच्या छोट्या-मोठ्या सवयी असू दे, हे सारे संस्कार धार्मिकतेच्या पायावरीलच हवेत. हल्लीच्या बहुतांश पालकांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान हेच पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले व चंगळवादी बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांवरही त्याच विचारांचे व कृतींचे संस्कार केले जातात.

अधिक गुण, गुणांची स्पर्धा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची स्पर्धा, पैसा, त्यासाठी करियर हा पालकांचा मुलांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व स्वसंस्कृतीचे विस्मरण यामुळे सध्याची लाडकी मुले `ऐकत नाहीत' असेच चित्र बहुतांश बघायला मिळते. यासाठी पालक त्यांना जास्तीतजास्त विविध छंद आणि शिकवणीवर्गांना घालून व्यस्त ठेवण्याच्या मागे असतात. त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, अशी बहुतांश सुशिक्षित पालकांची मनापासून इच्छा असते. मात्र अशा स्थितीत नेमके काय करावे, हे त्यांनाही कळत नसते.

आपण पालकांनी , सुसंस्कारीत पिढी घडवायला हवि

हे सुसंस्कार होणार कसे ? मुले सदवर्तनी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे पालकांनी स्वत: सद्वर्तनी असायला हवे आणि दुसरे म्हणजे त्यांना शिस्त लावण्याच्या जोडीला आपण हि काही गोष्टी टाळायला हव्यात ,
१. मुलांसमोर शक्यतो व्यसन नको (बिडी,सिगरेट ,तंबाखु .गुटखा ,दारू )

२. कोणत्याही कारणस्तव लहान मुलांसमोर खोटे बोलणे नको

३. आई -वडील किवा घरातील इतर वडीलधाऱ्या मंडळी मध्ये वाद नकोत , त्याचे मुलावर फार वाईट परिणाम होतात , मुले एक्क्लकोणी होणे ,बोटे चोखणे , घाबरून अबोल होणे हे सगळे त्याचेच परिणाम आहेत.

४. शक्यतो घरात जेवताना सर्वांनी एकदा तरी एकत्र जेवण घ्यावे लहान मुलांन पण घेऊन बसावे आणि जेवतात टीव्ही टाळावाच . छान गप्पा गोष्टी करत जेवण घ्यावे.

५.आजच्या तारखेला मुंबई सारख्या मेट्रो सिटी मधली सर्वांत मोठी समस्या म्हणजे "वेळ" आपण आपल्या रुटीन मधला किती वेळ मुलांना देतो. २४ तासातील रोज थोडा वेळ तरी फक्त आपल्या मुलांसोबत घालवता आला पाहिजे

साधनेचे किंवा उपासनेचे पाठबळ असेल, तर मुलांमध्ये सद्‌गुण चटकन अंगी बाणतात. हट्टी किंवा न ऐकणार्‍या मुलांना बदलण्याची शक्‍ती ही भगवंताच्या नामात आहे आणि याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. प्रथम पालकांनी भक्‍तीचे बीज स्वत:त पेरायला हवे, मगच ते बीज आपल्या मुलात निर्माण होणार. `वाल्याचा वाल्मिकी झाला' अशा गोष्टी आपण सांगतो. म्हणजेच भगवंताच्या नामातच मुलांमध्ये अमूलाग्र बदल करण्याची क्षमता आहे, याची जाणीव आपण सर्व पालकांनी ठेवली पाहिजे

१६ फेब्रुवारी, २०११

संस्कार - कालचे आणि आजचे

मुलांना संस्कार नाहीत, ते देण्यात आई वडील कमी पडतात, विभक्त कुटुंब पद्धती, घरात आजी आजोबांचे नसणे .... ह्या आणि अश्या अनेक कारणांचे खापर आजच्या पिढीवर फोडल्या जात.
मुलांना संस्कार देण्याची जबाबदारी आधी आई वडिलांची, मग शिक्षकांची आहे हे पिढ्यानपिढ्या आपण गुहीत धरत आलो आहोत. एखादा मुलगा वडीलधारयाशी वाद घालताना दिसला किंवा मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसली कि आई वडिलांचा उद्धार आज हि होताना दिसतो.

पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंतची परिस्थिती साधारण पणे अशी होती. मुल जन्माला आल्यानंतर आईच्या जवळच असायचं, त्या नंतर हळूहळू त्याच्या विश्वाच्या कक्षा रुंदावून त्यात वडील, भावंड, आजी आजोबा ह्यांचा समावेश होत असे. मुल शाळेत जाई पर्यंत त्याचं विश्व, हे फक्त त्याच कुटुंबच होत. त्यामुळे आईवडील आणि आजी आजोबा जे सांगतील ते आणि तेच बरोबर, हा विश्वास आपोआप त्या मुलामध्ये रुजायचा. आज मुल जन्माला येत आईच्या कुशीत पण वाढत आयाच्या मांडीवर किंवा पाळणाघरात. त्याला नजर येते ती टीव्ही वरची गाणी बघता बघता. टीव्ही वर कार्टून लागलं नसेल तर ते दुध पीत नाही. हातात पेन्सील धरता येत नसली तरी रिमोट ची बटण बरोबर दाबून हवं ते च्यानल लावता येत. रांगणारी मुल सुद्धा खुळखुळ्या ऐवजी मोबाईल शी खेळण पसंत करतात. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण ह्याच कौतुक सुद्धा करतो.

घरात रोज देवा जवळ दिवा लावल्या जात होता, शुभंकरोती आणि रामरक्षा आजी म्हणत असे ती आपसूक मुल आत्मसात करत होती. देवानंतर पहिला नमस्कार आईवडिलांना, हे आजीने शिकवलं त्यातून देवा नंतर च स्थान आई वडिलांचं हे कोणी न सांगताच मनावर कोरल्या जात होतं. मुल शाळेत जाई पर्यंत हा संस्कारांचा पाया मजबूत होत होता. घरातल्या व्यक्तीबद्दल चा आदर आणि विश्वास त्याचा आत्मविश्वास वाढवत होता. आज घरामध्ये आई वडील भाऊ बहिण आजी आजोबा ह्यांच्या बरोबर टीव्ही मालिका मधली characters , त्यातले भडकपणे दाखवल्या जाणारे प्रसंग हे सुद्धा त्या बालमनावर संस्कार करतात.

पूर्वी, घरात आईने एक आणि आजीने दुसरं सांगितला तर कोणतं स्वीकारायच ह्या संभ्रमात मुलं बावचळून जात होती. मग आता चाहु बाजूने चार अतिशय भिन्न संस्कार त्यांच्यावर घडले तर ते किती गोंधळून जात असतील? नोकरी करणारे आईवडील त्यांना जेवढा वेळ देवू शकतात त्याही पेक्षा हे टीव्ही आणि कॉम्पुटर त्यांची जास्ती सोबत करतो. घरातल्या वडील मंडळींकडून कितीही सात्विक संस्कार मिळाले तरी ह्या माध्यमातला चमचमीतपणा त्याला आकर्षित करणारच. मग आई वडील यांच्या पेक्षा ते ह्या यंत्रांवर विश्वास ठेवतात.

पूर्वी सकाळची न्याहारी आणि रात्रीच जेवण हे संपूर्ण कुटुंब एकत्र करत असत. त्यामुळे पंक्ती प्रपंच, वाढलेले पदार्थ न टाकता सगळे संपवणे, अन्नाचा मान राखणे, हे जेवताना अपेक्षित असलेल वळण, वेगळं लावाव लागत नव्हत.पूर्वी वडील संध्याकाळी घरी आले, कि संध्याकाळी नाष्टा चहा होत असे आणि रात्री सगळेजण एकत्र येवून, गप्पा मारत, मजेत जेवण होत असत. आता नोकरीच्या वेळा बदलल्या. आई वडील घरी पोचेपर्यंत जेवणाची वेळ टाळून गेली असेल तर मुलं आपल्याच हातानी फक्त आवडेल तेच पदार्थ वाढून टीव्ही समोर बसून जेवतात. ह्यात त्या गृहिणीचा हि दोष नाही किंवा मुलांचा तर अजिबात नाही. आज एकतरी घर असं आहे, कि जिथे टीव्ही नाही? टीव्ही कॉम्पुटर ह्या आता गरजेच्या वस्तू झाल्या आहेत.

घरी वडीलधारया माणसांचा आदर ठेवावा आणि तोच विश्वास शिक्षकांवर ठेवावा हि शिकवण घरातून मिळत होती. सगळेच शिक्षक उत्कृष्ट शिकवत होते असा त्याही काळी नव्हत पण शिक्षकांचं स्थान पूजनीय होत. त्यांच्या शिक्षकी पेश्यामध्ये पुस्तकी ज्ञान देण्याबरोबर समाज घडवण्याची जबाबदारी सुद्धा गृहीत धरली होती. मुलाला शाळेत घातलं कि त्या मुलाच आयुष्य घडवण्याची जबाबदारी शिक्षक स्वीकारत होते.
आज मुळात शिक्षकी पेशा आवडीने आणि त्यातली जबाबदारी समजून तो स्विकारणारे शिक्षक दुर्मिळ झाले आहेत. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी कि पूर्वी ज्ञान मिळण्याचा एकमेव आधार हा शिक्षक होता. आज संगणक तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे कि मुलांना हवी ती माहिती एका 'click ' वर मिळते.

पूर्वी मनातला कोणताही प्रश्न वडीलधाऱ्या व्यक्तीला विचारला कि मिळेल ते उत्तर बरोबरच आहे असा गृहीत धरून मुलं ते आत्मसात करत होती. त्या विरुध्द बोलण्याची मुलांची हिम्मत नव्हती आणि वडीलधार्या माणसाना सुद्धा तो अपमान वाटत असे. आज मुलं मोकळेपणी चर्चा करतात, विचारतात, पण त्यानंतर गुगल वर जावून पडताळून बघतात. तुमच उत्तर जर त्या उत्तराशी समन्वय साधणार नसेल तर ते तुम्हाला स्पष्ट पणे सांगायला मागे पुढे बघत नाहीत. पण त्या मागचा त्यांचा हेतू तुमचा अपमान करण्याचा नसतो.

पूर्वी दोन पिढ्यांमध्ये साधारणपणे २० वर्षाच अन्तर असत असं म्हणाल्या जायचं. आता ते पाचच वर्ष झालं आहे. म्हणजे आपल्या मध्ये आणि आपल्या मुलांमध्ये साधारणपणे चार पिढ्यांचं अंतर पडत. हि ग्याप कमी करण्यासाठी आपण थोडं जोरात धावायचं कि मुलांना मागे ओढायच? आपण दोन पावलं पुढे गेलो तर मुलं मागे वळून तरी नक्कीच बघतील.