१५ ऑगस्ट, २०१४

मुले खोटे का बोलतात ? – मंगला गोडबोले


मुलांना वाढवताना काही प्रसंग मोठे बाके यायचे. म्हणजे उदाहरणार्थ, नेमकी मी घरात नसताना आणि नेमकी दोन्ही कार्टी घरात असताना घरातली सर्वांत सुंदर फुलदाणी फुटणे वगैरे. कोणी फोडली विचारले की, दोघेही कानावर हात ठेवायची. दोघांपैकी कोणीही तिला धक्का, हात किंवा बोटही लावलेले नसायचे; फार काय तिच्याकडे कटाक्षही टाकलेला नसायचा. पुराव्यादाखल एक मूल देवाची शपथ घ्यायचे, दुसरे माझी शपथ घ्यायचे. म्हणजे मामला आटोपलाच. घरामध्ये या दोघांखेरीज तिसरे भूत आढळलेले नसल्याने भुताटकीची शक्यताही नाकारावी लागायची. मग खात्रीचा निष्कर्ष काय काढायचा? मुले खोटे बोलताहेत एवढाच! मुले अधूनमधून खोटे बोलायचीच. अजूनही बोलतात. बदल असेल तर तो खोटे बोलण्याच्या हेतूमध्ये आहे एवढेच. लहानपणी ती मार चुकवायला खोटे बोलत असतील, तर आता कुमारवयात एखादा आळ चुकवायला खोटे बोलतात. तेव्हा एखादवेळेस स्वत:चा निष्पापपणा सिद्ध करायला खोटे बोलत असतील तर आता आपले खाजगीपण किंवा प्रायव्हसी सिद्ध करायला खोटे बोलून जातील. म्हणजे दर वळणावर कमीअधिक खोटे आहेच. खरे बोलायचे तर मुलांनी अधूनमधून खोटे बोलणे अटळच आहे. बिचा:यांवर नाना अडचणी येत असतात. नेमके क्लासच्या वेळात टी.व्ही.वाले चांगला सिनेमा दाखवायला निघाले की, क्लास बुडवताना खोट्याचा आधार लागतो. शाळेत आपल्या हातून प्रयोग करताना टेस्ट-ट्यूब फुटली आहे हे घरी कळू द्यायचे नसते. खडूस मास्तरांच्या शिक्षेच्या संकटातून मित्राला वाचवायचे असते. (मित्राऐवजी मैत्रीण संकटात आली तर ही जबाबदारी अनेक पटींनी वाढते.) काही वेळा मित्रमैत्रिणींवर ‘इम्प्रे’ टाकण्यासाठी कल्पनाविलासात्मक खोटे बोलावे लागते. कपिलदेव किंवा माधुरी दीक्षित आपल्याला ‘हॅलो’ म्हणाले असे अनेक मुले एकदा ना एकदा सांगतात. काहींना हळूहळू स्वत:लाही ते खरे वाटायला लागते. तेवढाच त्यांचा वेळ बरा जातो. अशा निरुपद्रवी खोट्यांपासूनच बहुतेक मुलेमुली थापेबाजीला सुरुवात करतात. शिवाय घरातल्या थापविलासाचे दर्शनही होत असतेच. टी.व्ही.वरची टेस्ट मॅच बघण्यासाठी ऑफिसला दांडी मारून घरी राहिलेले बाबा ऑफिसमध्ये खोटी सिकनोट पाठवतात. आपला ‘स्पेअर बर्शेन सिलिंडर’ मैत्रिणीला द्यावा लागू नये म्हणून आई अभिनयाची पराकाष्ठा करत मैत्रिणीला म्हणते, ”तुला दिलाच असता गंऽ पण आज आमच्याकडे पार्टी आहे ना…” मुलांवरती या सगळ्यांचा कळत-नकळत परिणाम होतच असणार. पण गंभीर परिणाम होतो तो आई-वडिलांवर. मुलांच्या खोटारडेपणाने आई-वडील खोलवर दुखावतात. ‘बिचा:या आपल्या मुलांचा नैतिक अध:पात होईल’ यासाठीचे हे दु:ख अर्थातच नसते. दु:ख असते अविश्वासाचे, फसवणुकीचे, आपली सत्ता नाकारल्याचे. पहिल्या मुलाचे पहिले खोटे अनेक पालकांना जड जाते ते यामुळेच. पुढे सवय होते किंवा करून घ्यावी लागते. खोट्यांचे विश्वरूपदर्शन रोज उठून घडायला लागते. सगळी खोटी ही स्पष्टपणे खोटी नसतात. त्यांच्या नाना छटा असतात. साधारणपणे तिसरी-चौथीपासूनच, बाहेरच्या किती गोष्ट घरात सांगाव्यात व किती सांगू नयेत याची आपापली गणिते मुले बसवायला लागतात. असे ‘निवडक सत्य’ (Partialtruth) हेही एका परीने खोटेच की. फसवणे…लपवणे…वाढवून सांगणे यात कमीजास्त मार्क कसे देणार? प्रश्न मोठा बिकट असतो. ”सत्य सदा बोलावे, सांगे गुरू आणि आपुला बाप! असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप॥” असे ऐकत, म्हणत मोठ्या झालेल्या पालकपिढीला तर तो फारच बिकट वाटायला लागतो. ‘खोटे कधी बोलू नये,’ ‘बरे सत्य बोला…’, ‘सत्यमेव जयते…’ हे सगळे काय उगाचच शिकवले जात होते? मला असे अजिबात वाटत नाही.उलट वाटते, तसे शिकवले हे बरेच झाले. निदान सत्याच्या बाबत तरी, ”आम्हीही सुंदर झालो असतो…” असे म्हणण्याची वेळ आजच्या पालकपिढीवर त्यांच्या अगोदरच्यांनी येऊ दिली नाही. त्यांनी शिकवायचे ते शिकवले, यांनी घ्यायचे ते घेतले. त्यांनी आदर्श पुढे ठेवला, यांनी त्यात वास्तवाचे पाणी घालून तो हवा तेवढा पातळ करून घेतला. सत्यही राहिले, त्यामध्ये प्रत्येकाची आवड, ऐपत, सोय हेही गरजेप्रमाणे मिसळून गेले. पुढची पिढी ही सर्वच बाबतींमध्ये पुढची. त्यामुळे स्वत:ला हवे ते करणारच आहे. वाढते स्वातंत्र्य, वाढती प्रलोभने यांमध्ये सत्याची पीछेहाट होणारच आहे. पालकांनी ती कशी स्वीकारावी हे कळणे ही काळाची गरज आहे.अनुभवावरून आणि वाचन-विचारांवरून मला असे वाटते, मुलांच्या कोणत्याही खोट्यावर एकदम आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे पालकांनी टाळायला हवे. खोटे बोलण्यामागचे कारण काय आहे हे प्रसौम्यच घ्यायला हवी. म्हणजे समजा, प्राथमिक शाळेतल्या मुलाला कपिलदेवने ‘हॅलो’ म्हटले असेल तर ते तसे म्हणू द्यावे. ‘हॅलो’ म्हणायला हरकत घेणारे आपण कोण? तसेच गमतीने रुपयाचे नाणे गिळायला जाणारे प्रत्येक मूल काही मोठेपणी एक्साइज इन्स्पेक्टर होत नाही हेही समजून घ्यावे. ही गंमत गमतीच्याच पातळीवर राहते आहे हे बघितले म्हणजे पुरे. थापेसाठी थाप, मजेसाठी खोटे बोलणे इतपत निरुपद्रवी असत्य फारच तात्कालिक असते, त्याला तितक्याच गांभीर्याने वागवावे. शिक्षेच्या भीतीने, स्वत:ला किंवा दुस:याला वाचवण्यासाठी बोललेले खोटे जरा तपशिलाने बघावे. शिक्षेची वेळच मुळात का यावी? वाचवण्यासाठी आटापिटा का करावा लागला याचा विचार व्हावा, याबद्दल मुलांशी सल्लामसलत व्हावी, ही वेळ वरचेवर येऊ नये म्हणून मार्गदर्शनही द्यावे. केवळ कौतुक करून घेण्यासाठी मूल खोटे बोलत असेल तर त्याची कौतुकाबाबत फार उपासमार तर होत नाही ना हेही बघितले जावे. कौतुकाची गरज काही मुलांना जास्त वाटते, जसे, स्वातंत्र्य किंवा प्रायव्हसीचे आकर्षण काही मुलांना इतरांपेक्षा लवकर वाटायला लागते. त्यांना त्या हौशी भागवण्यासाठी खोटे बोलायला लागणार नाही, यासाठी पालकांनी जागरूक राहावे. काम किंवा कर्तव्य टाळण्यासाठी, हेतुत: फसविण्यासाठी, कोडग्या स्वार्थासाठी, हीन स्पर्धेसाठी खोटे बोलणे मात्र केव्हाही क्षम्य समजू नये, दुर्लक्षू नये.थम समजावून घ्यायला हवे. कारण जर फुटकळ किंवा सौम्य असेल तर प्रतिक्रियाही अशा वेळा बहुधा किशोरवयानंतर जास्त येऊ लागतात. आता आता इवले वाटलेले मूल एकदम मोठे होते, बाहेरच्या विराट दुनियेत फेकले जाते. अशा वेळी त्याचा खोटेपणा वाढला तर पालकांनी एकदम सजग व्हायला हवे. हे मूल शिक्षणाव्यतिरिक्त काय करते, कुठे जाते, कोणात मिसळते, कोणती वाहने चालवते, टी.व्ही.-व्हिडीओवर काय बघते, ड्रग्ज वगैरे तर घेत नाही ना, हे सगळे बारकाईने बघायला हवे आणि कितीही अप्रिय वाटले तरी वेळच्या वेळी याला आळाही घालायला हवा. एक खोटे निस्तरायला दहा खोटी बोलण्यापर्यंत त्याची मजल जाऊ देऊ नये. मुलांना खरे आणि केवळ खरेच बोलायला लावणे केव्हाही कठीणच होते. आज ते कधी नाही इतके दुर्घट होत चालले आहे. ‘खोटे कधी बोलू नये’ हे वाक्य प्रिय तर खरेच, पण त्या ‘कधी’ पुढे ‘च’ आणि वाक्यापुढे भलाभक्कम पूर्णविराम देण्यापेक्षा, खोटे कधी बोलू नये? हे प्रश्नचिन्हात्मक मार्गदर्शन मला जास्त मोलाचे वाटते ते यामुळेच. जिथे आपल्यावर विश्वास टाकला जातो, जिथे वैयक्तिक किंवा सामूहिक नीतीचा प्रश्न येतो, जिथे आपल्या खोट्याने दुस:यावर अन्याय होतो, दुस:याला दु:ख होते, तिथे खोटे नक्कीच बोलू नये, बोलल्यास त्याची गयही करू नये. बाकी किरकोळ एप्रिल फूल बाराही महिने केले तरी चालेल. असा कुठेतरी सत्याशी समझोता व्हायला हवा. टीप : हा लेख लिहिताना Why Kids Lie या Paul Ekman यांच्या पुस्तकाचा मला विशेष उपयोग झालेला आहे. हे सगळे माझेच आहे असे खोटे कशाला बोला? मंगला गोडबोले

३० ऑगस्ट, २०१३

सुजाण पालकत्व

आपण पालक होतो हा एक प्रकारचा बहुमानच आपल्याला मुल झाल्यामुळे मिळालेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्या मुलाचे आभार मानायला हवेत. त्याचामुलेच आपण आई किंवा बाबा झालेलो असतो. जसे तुझ्यामुळे मी झाले आई , बाळा होऊ कशी उतराईहे तर ऐकूण काय मुलं आणि पालक या नात्यातील अंतर कमीतकमी असायला हवं. हे नाते संबंध पाळताना काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत ते पाहू .




        मुलांचा सर्वप्रथम पहिला शिक्षक आईहाच असतो . किंवा पालक जो कोणी असतो तो . आई असल्याचा विलक्षण अभिमान तिला असतो . नकळतच तिचं हे जगणे  आनंदमयी होऊन गेलेले असते. त्याच्या आईह्या संबोधनाने पुकारण्याचा त्या कोवळ्या जीवावरून ती आपला जीव ओवाळून टाकत असते . ह्याच उच्यारांसाठी तिचे कान आतुरलेले असतात.ती धन्य झालेली असते . भूक लागली कि रडायचे हे काय आई किंवा पालक शिकवीत नाही . प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आपण मुलांना देतो . तो ओळखायला ती अंतप्रेरणेने शिकतात . त्याच अंतप्रेरणेतून ती ईतरही गोष्टी शिकतात . मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याचा   आय क्यू ओळखून मुलांच्याकडून त्या प्रमाणात अपेक्षा केली पाहिजे . मुलांच्या मेंदूची वाढच मुले ३ वर्ष होईपर्यंत झालेली नसते.हे ओळखून त्याच्या शरीरिक वाढीसाठी आणि मग मानसिक वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. ३ वर्षापर्यंत तरी मुलं डोक्यावती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत पाठपुरावा , धाकदाखून शिकवू पाहणारे पालक , आणि प्रथम आपण कृती करून त्यातून चांगल्या गोष्टी उचलणारे मुलं ह्या दोन्ही परस्पर्विरोधी गोष्टी आहेत . परंतु मुले आपल्या कृतीतूनच घडत असतात . उत्तम मुल , उत्तम विद्यार्थी , किंवा उत्तम नागरिक म्हणून कलागुण त्याचे जोपासायचे असतील तर आपल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण ती करत असतात . आपल्या सर्व गोष्टींचे मुलं निरीक्षण , बारकाईने आपल्या सर्व गोष्टी मुलं न्याहाळत असतात . आणि त्यातूनच मुलं घडत असतात . त्या निरीक्षणातूनच त्यांच्यातला खरे-खोटेपणा सिद्ध होत असतो . म्हणजेच पर्यायाने आपली जबाबदारी फारच वाढलेली असते . आपली प्रत्येक कृती , मग ती अगदी छोटोशीच का असो . चांगल्याची , पवित्रपणाची, प्रमानिकपणाची, प्रेमाची, स्नेहाची , त्यागाची, बुद्धीची असायला हवी . मुख्य म्हणजे त्यांचा सदगुण वाढीस लावणे हे पालकांनी करायला हवे . खऱ्या अर्थाने सद्गुणांचा विकास म्हणजेच मानवतेचा विकास आहे . ह्या गुणामुळे तो मोठा होतोच पण सामाज्यासाठी आणि देशासाठी त्याच्याकडून चांगले कार्य घडते . त्या गुणामुळेच सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो . त्याच्या सहवासात आनंदच मिळतो . हे कशामुळे शक्य झालेले असते तर चांगल्या गुणांची जोपासना करायला हवी.पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये . कारण त्यांचे हे दिवस परत येनारे नसतात. त्यांना फक्त प्रेमानेच जिंकायचे असते . कावळा दिसला कि हातातले बिस्कीट पुढे करणारे मुल हे उपजतच अंतप्रेरणेने होत असते . हि त्यांची भावना वाढीस लावण्याचे काम पालकांनी करावयाचे असते . एक तीळ सात जणांनी वाटून खायचा हे जपणारी आपली संस्कृती पालकांनी आपल्या मुलांकडून चालू ठेवायची , दिल्याने आनंद वाढतो हे पालकांनीच मुलांना शिकवायचे असते . अगदीच हटी् मुलं असेल तर रागवायचे पण ते कौशल्याने त्यांचा अहंकार दुखावणार नाही या बेताने.
खरं म्हणजे निरोगी मन असते .पण आधी शरीर निरोगी असायला हवे.तरच मन प्रसन्न ताजे-तावाने राहते . आणि ते शरीर निरोगी ठेवायची जबाबदारी पालकांची असते . मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर शारीरिक सुदृढता हवी . सर्व प्रकारचे अन्न घटक शरीरात गेल्यामुळे मन व शरीर सुदृढ बनते . असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे . त्यांना सगळ्या चवींची गोडी लावण्याचे काम आईचे आहे . ॠतुमानानुसार खाण्यात बदल करायला हवा . थंडीच्या दिवसात तेलाचे करायला हवे . थंडीचा ४ महिन्यात जर लक्षपूर्वक आहार विहार ठेवला तर पुढचे ८ महिने निर्धास्त राहायला हरकत नाही . अशी जुनी पिढी सांगत असते . त्यांच्या सांगण्याचं तथ्य तसेच झोपविश्रांती हि सुद्धा पूर्ण झालेली असेल तरच ते मुल तरतरीत दिसते . नाहीतर ते अथरुनातूनच रडत उठते . म्हणजे त्यांचे काहीतरी बिघडलेले असते हे पालकांनी ओळखायला हवे . निरोगी विचारच पुढच्या आयुष्यातील काम सोपे करतात . मुलांच्या मनात जिव्हाळा आणि कृतक्षता या दोन्ही भावना वाढीस लावायच्या त्या रुजवल्या कि आपोआप वाढीस लागतात . कारण या दोन भावनाच आपल्या संबंधात आलेल्या व्यक्तीशी, सामाजाशी आणि पर्यायाने विश्वाशी नातेसंबंध जिवंत ठेऊ शकतात . माणुसकीने वागल्यामुळे त्याचे थोरपण ठरत असते . आणि मग ते मुल कुणाचे आहे , याची विचारणा होते . पर्यायाने संस्कारातून या गोष्टी पुढे जाऊ शकतात . उत्तम संस्कार माणसाला मोठे करतात . शिक्षणाने जसा अज्ञानाचा अंधकार दूर होतो . तसे माणसाने आपल्यातले माणूसपण टिकवायचे असते . माणुसकी हि खरी जात आहे . हे माणसाला कळले पाहिजे .
       एकविसाव्या शतकातली गतिमानता नवीन नवीन रोगांना आमंत्रण देते . एवढेच नव्हे तर पूर्वी म्हतारपणी होणारे रोग तरुणपणात व्हायला लागलेत . तेव्हा चंगळवादामुळे हे घडते . आळसामुळे रोगाची मुळे शरीरात जोर धरू लागतात . आहार-विहार आणि विचाराला धरबंध नसेल तर पुढील पिढीत असेच चित्र दिसेल . म्हणूनच आताच्या शिशूंना शिस्तीचे स्वावलंबनाचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे . आणि ते आपल्यापासूनच ॠढ व्हायला हवे . ताण-तणाव नको म्हणून आई वडिलांचे निकोप नाते हवे . कारण मुल जास्त वेळ घरात असते . तीथें ते निर्भय असते . त्यांचा कोणत्याही तऱ्हेचा कोंडमारा होता कामा नये . नंतर मोठे झाल्यावर त्यांची मित्र-मंडळी कशी आहेत , याच्यावर पालकांचे लक्ष हवे . ती सुदधा चांगल्या संस्कारांच्या घरांतील मुले आहेत कि नाही हे पालकांनी तपासायला हवे . मुळे खोटं बोलत नाही ना ? कोणत्याही प्रकारची लबाडी मुळे करत नाही ना ? याकडे पालकांचे विशेष लक्ष पाहिजे . वडिलांचे मुलाशी मित्रासारखे नाते हवे . आईचे मुलीशी मैत्रीनिसारखे नाते हवे . पालकांचे वागणे पारदर्शी पाहिजे. / मुळे आपोआप शहाणी होतात . आनंद देतात . त्यांच्यातला कलागुण ओळखून त्याला योग्य तऱ्हेने वाव देणे पालकांचे कर्तव्य आहे . त्यांच्या चुकांबद्दल योग्य समज देणे , चांगल्या कामगीरीबद्धल शाबासकी देणे . या दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे . मुलांना आई वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे . आपले आदरयुक्त प्रेम असेल तर मुळे अपोअपच पालकांना आपले आदर्श मानतात .
       दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी मुल यात गुरफटलेली स्त्री आपल्या मुलाकडे न थकता लक्ष देते . हे तिचे खरे कौशल्य आहे . त्याच्या चौकसबुद्धीला खात-पाणी घालते . मुळे फक्त अभ्यासात हुशार असली पाहिजे असे नव्हे , तर त्याच्यातला छंद मुलांना जोपासता आला पाहिजे . व्यवहार चतुर कशी होतील हे सुजान पालकांनी शिकवले पाहिजे . त्यांचा अपमान करू नये . त्यांना चांगल्या शब्दात समाज द्यावि . मोठ्या माणसांशी कसे वागावे हे लहानपणीच शिकवावे .
आई हि सुसंस्कारांची जननि आहे . आईच्या प्रत्येक कृतीत , प्रत्येक शब्दात , प्रत्येक सल्ला व उपदेशात सुसंस्कार व नैतिक मूल्य भरलेली असतात . आई, वडील, शाळा, गुरु हे संस्कारांचे अधिष्ठान आहे . गुरु, विद्या संभाषन नेतृत्व असे विविध पैलू शिष्यावर पाडत असतो . चांगल्या नेतृत्वाची समाज्यात गरज आहे . आणि चांगल्या नेतृत्वाची समाज कदर पण करतो समाज जर समृद्ध आणि सकस हवं असेल तर हे बाळकडू लहानपणीच मुलाना पाजावे लागेल.  घरातील नात्यामधील जिव्हाळा, एकमेकांशी सुसंवाद , सुसंस्कार आपलेपणा , एकमेकांसाठी करत राहण्याची वृत्ती यामधून मुलानमध्ये आनंदाचे झाड जागवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी केला पाहिजे . मुलांनी खूप मोठ्मोटया पदव्या घेऊन खूप पैसे कमावण्यापेक्षा साधे राहून एकमेकांवर प्रेम करून दुसऱ्यांच्या गरजेला साहाय्य करून ,धाउन जाऊन अशा आशीर्वादात जगलं पाहिजे . अलीकडे एकमेकांशी सुसंवाद संपल्याची खंत वाटते ,त्यामुळे स्वभावात तुटकता अलयाचे जाणवते , एकटेपणा आवडतो , त्यामुळे स्वार्थी दृष्टी बनते . हे पालकांनी सांभाळले पाहिजे . तुकाराम महाराज म्हणतात मना करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण” , मन मुळात प्रसन्न पाहिजे मग जग जिंकल्याचा अनंद मिळेल . उत्साह, सकारात्मक जगण्याची वृत्तीच आनंदि ठेवते . उपासना कशासाठी आहे, मनाच्या स्वास्थासाठी कोणतीही उपासना करा . मन स्थिर आणि आनंदी राहण्यासाठी या गोष्टी आहेत . जसे योग आणि ध्यानधारणा यासुद्धा आनंदी जीवनासाठी उत्तम आहेत.  मुलांमध्ये या आवडी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत . वाचनाची आवड रुजवली पाहिजे . शिस्त , काटकसर , वेळेचे नियोजन या गुणांमुळे मुले नकिच यशस्वी होतील . मुलांकडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा पालकांना आणि कशाचीच अपेक्षा नसते . आपली ऐपत असली तरी मुलांना मागितली वस्तू कि लगेच देऊ नये . त्यांना पैशाची , वस्तूची किंमत राहत नाही . अपण सारेच आपल्या मुलांवर प्रेम करत असतो . त्यांच्या सुखासाठी क्षण-क्षण वेचीत असतो . त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपला प्रत्येक आनंद सुख बलिदान करीत असतो . तेच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले असते . याची जाणीव ठेऊन त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी त्यांना आपुलकी , प्रेम , सुरक्षा मिळणे हाच त्यांचा अधिकार असतो . तो देणे आपले कर्तव्य आहे . आजी आजोबांचे प्रेम त्यांना मिळावे हि धडपड प्रत्येक आई वडिलांनी केली पाहिजे . ते सुधा आपल्याच कुटुंबाचा एक भाग असतात. सोईच्या दृष्टीने ते वेगळे राहत असले तरी त्यांच्याशिवाय आपले कुटुंब अर्धावर आहे . अपुरे आहे . याची जाणीव हवी . आपल्या मुलांना वाढवताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे जसे लक्ष देता तसेच आपल्या आई वडिलांच्या मानसिक गरजा भागविणे त्यांची देखभाल करणे त्यांना सुखी व आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे .
नाती वडिलांकडील किंवा आईकडील असो . सारीच मैत्रीची असावीत जीवनासाठी ती गरजेची आहे.उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीसाठी योग्य मानसिक विकासासाठी सुख  शांती,समाधानासाठी,सर्वांशी उत्तम संबंध असणे आवश्यक आहे . शेजारी-पाजारी तसेच इतर नातेवाईक सर्वांशी प्रेमाने असावे म्हणूनच अडूपण विसरून सर्वांशी स्नेहसंबंध मजबूत करायला हवे . मुलांना हे नात्याचे मोल समजून द्यायला हवे . आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा आहार आहे . 
भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ती वाढविणे आणि तिची जोपासना करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे




२१ ऑगस्ट, २०१३

तंत्रयुगातील पालकत्व




ही गोष्ट आहे अमेरिकेतील जेनेल हॉफमन या मातेची. आपल्या १३ वर्षांच्या ग्रेग या मुलाला तिने आयफोन घेऊन दिला. मोबाइल फोन ही गरज बनलेल्या आजच्या काळामध्ये भारतातही आठ-दहा वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाइल पडतो आहे. त्यामुळे मुलाला आयफोन देऊन तिने अगदी जगावेगळे असे काहीसुद्धा केले नाही. मात्र , जेनेलने आपल्या मुलाला फक्त फोनच घेऊन दिला नाही , तर फोनबरोबर एक १८ कलमी यादी देऊन तिने आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे. मुलांनी मोबाइल फोन कसा वापरावा याची आचारसंहिताच या यादीद्वारे तिने तयार केली आहे. मुलांशी- विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांशी कसा संवाद साधावा या पेचात सतत असणाऱ्या भारतीय पालकांनासुद्धा ही आचारसंहिता मार्गदर्शक ठरू शकेल. जेनेलने आपल्या मुलाला उद्देशून म्हटले आहे , की ' हा फोन मी विकत घेऊन तुला देत आहे. फोनवरील पासवर्ड तू आम्हाला म्हणजे पालकांना सांगायला हवा. आम्ही फोन केल्यानंतर तू तो घ्यायला हवा. दररोज रात्री तू हा फोन आम्हाला द्यायला हवा. सुटीच्या दिवशी तो उशिरापर्यंत फोनवर असला तरी चालेल. अश्लील आणि पोर्न साइट्स तू पाहू नकोस. त्याचबरोबर अश्लाघ्य भाषेतील मजकूर वा आशयही पाहू नकोस. ' जेनेलने लिखित स्वरूपात केलेल्या या सूचना तिच्या मुलालाच नव्हे , तर फोन वापरणाऱ्या जगभरातील सर्वच कुमारवयीन मुलांना लागू आहेत. फोन हरविला , खाली पडला , त्याचे तुकडे झाले किंवा बिघडला तर नवा फोन मिळणार नाही , त्यासाठीची रक्कम जमा करावी लागेल , असेही तिने आपल्या मुलाला सांगितले आहे. मोबाइल वा कम्प्युटरमधील तांत्रिकता ही पालकांपेक्षा मुलांनाच माहीत असते. त्याबद्दल पालकांना अभिमानही वाटत असतो. मात्र , मुले फोनवर वा इंटरनेटवर तास न् तास काय करीत असतात हे ते जाणून घेत नसतात. अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम असले , तरी त्याचा गैरवापर करणारे अनेकजण असतात. त्या जाळ्यात आपली मुले अडकणार नाहीत , सोशल मीडियाच्या भासमान जगाचे त्यांना व्यसन लागणार नाही , याची काळजी पालकांनी घ्यायलाच हवी. त्यासाठी काय करता येऊ शकते , याचे एक उदाहरण जेनेलने दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान युगातील पालकत्वाचा हा कित्ता सर्वांनीच गिरवण्यासारखा आहे.

शाळेची अति घाई-कि आपली सुटका

मुलांना पटापट मोठं करायला निघालेल्या आई-बाबांनो, जरा सबुरीनं. दीड-दोन वर्षांचं मूल. रडत-भेकत शाळेत जातं.पालकांना वाटतं, मूल लवकर शाळेत गेलं म्हणजे ‘बुद्धिमान’ होईल, लवकर पुढे जाईल, स्पर्धेत सगळ्यांच्या पुढे राहील. शाळाही त्यांना ‘हुशार’ करण्याचा चंग बांधतात. लेखन, वाचन, पाठांतर. त्यांच्या बोकांडी मारतात. त्यातून मूल खरंच हुशार होतं?. झ्या मैत्रिणीनं तिच्या मुलीला शाळेत घातलंय. ती फक्त दीड वर्षांची आहे.’’ ‘‘मुलांना लवकरच्या वयात शाळेत घातलं म्हणजे बरं पडतं. त्यांना सवय लागून जाते.’’ ‘‘मला आणि त्याच्या बाबांना नोकरीवर जायचं असतं. थोडा वेळ तो शाळेत गेला, म्हणजे आजी-आजोबांना पण सांभाळायला सोपं जातं.’’ ‘‘तो खूप रडतो शाळेत जाताना. पण मी तरी काय करू? मला कामावर जावं लागतं.’’ हल्ली अशी वाक्यं खूपच कानावर पडतात. कुठेही जा, एखाद्या गावात, नाही तर शहरात, मुलांना जेवढय़ा लवकर शाळेत घालता येईल तेवढय़ा पटकन त्यांना शाळेत पाठवायचं, असं जणू फॅडच आलंय. दिवसेंदिवस ते वाढतही चाललंय. खूप लहान लहान मुलं अडखळत्या पावलांनी आई-वडिलांबरोबर शाळेची वाट चालू लागली आहेत. का होतंय असं? या संदर्भात काही शाळाचालक म्हणतात, ‘आमच्या शाळेत आधी फक्त ‘के.जी.’च होतं. पण पालकांच्या आग्रहामुळे आम्ही ‘मिनी केजी’ आणि त्या आधीच्या वयासाठी प्ले ग्रुपही सुरू केले.’’ काही शाळाचालक मात्न लहान मुलांना लवकर शाळेत घालण्याचं व्यवस्थित सर्मथन करतात. .प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मुलांच्या ‘लवकरच्या शाळे’चा विचार करतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, ज्याला/जिला शाळेत घालायचंय, घातलंय, त्यांचा विचार कोणीच करत नाही. - त्यांना शाळा हवीये का? - त्यांना शाळा आवडते का? - त्यांना शाळा झेपेल का? - ते शाळेत जाऊन नक्की काय करणार आहेत? काय शिकणार आहेत? - हे आत्ताच शिकणं आवश्यक आहे का? - आत्ता मारून-मुटकून शाळेत नाही घातलं तर चालणार नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे दीड-दोन वर्षाचं वय शाळेत जायचं आहे का? हे प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळायला हवीत. - असा विचार करताना लक्षात येईल की, आपण पहिल्याच प्रश्नाला अडखळलो आहोत. ‘मुलांना शाळा हवी आहे का?’ या प्रश्नाचं काय उत्तर आहे? यावर कोणीही म्हणेल की, ‘त्याला काय कळतंय शाळा म्हणजे काय ते? हा विचार आपणच करायचा असतो.’ पण आपण तरी करतो का असा विचार? बहुतेक जण शेजार्‍यानं, मित्नानं, मैत्रिणीनं, नातेवाईकांनी त्यांच्या मुलांना शाळेत घातलं, मग आपणही घालायला पाहिजे, असा विचार करतात. त्यातूनच मग अशा छोट्यांच्या शाळा जन्माला येतात. त्यात मुलं जायलादेखील लागतात. के.जी.च्या आधी मिनी के.जी. आणि त्याआधी प्ले ग्रुप सुरू झालेत. मुलांना पटापट मोठं करायला निघालेले आई-बाबा आणि त्यासाठी आपला एक एक वर्ग खाली करणारे शाळाचालक यामुळे मुलांना लवकर शाळेत घालायचं पेव फुटलंय. यात सारासार विचार कोणीच करत नाहीये. आई-बाबा नाही आणि शाळाही नाही. अगदी दीड वर्षाचं असताना प्ले ग्रुपला घातलेलं आपलं मूल पटापट अभ्यास करायला लागणार आहे, अतिशय बुद्धिमान होणार आहे, असं सार्‍यांनाच वाटतंय का? ही मुलं शाळेत जाऊन नक्की काय करणार आहेत? काय शिकणार आहेत? आणि हे आत्ताच शिकणं आवश्यक आहे का?. सध्या तर असं दिसतंय की, बुद्धीचा विकास वगैरे जाऊ द्या, मुलांच्या साध्या शारीरिक गरजासुद्धा शाळेच्या या सोसापायी पूर्ण होत नाहीयेत. अशा शाळा बहुतेक सकाळी लवकरच्या असतात. झोपेतून उठवून तयार करून शाळेत पाठवणं, खाणं झालंय की नाही, शी झालीये का नाही याकडे दुर्लक्ष करून भराभर आवरून वेळेत सोडून येणं हेच महत्त्वाचं. कितीही रडत असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून सोडून येणं, शाळेच्या शिक्षकांनी मुला/मुलीचा ताबा घेणं. हे अशा छोट्या-छोट्या मुला-मुलींच्या बाबतीत रोजच्या रोज घडतं. बर्‍याच मुलांना हे बदल स्वीकारता येत नाहीत. ते रडत राहतात. शिक्षक काही मिनिटं रडणार्‍या मुलांना घेऊन बसतात. पण सारखं कोण घेऊन बसणार? काही मुलं तर सहा महिन्यांपर्यंत शाळेत सोडलं की रडत राहतात. अगदीच निरुपाय झाल्यावर केव्हातरी रडणं बंद करतात. या सगळ्य़ातून आई-बाबा आणि शिक्षक काय साधतात? यामुळे मुलांच्या मनावर दीर्घकालीन काय परिणाम होणार आहे हे आई-बाबांनी लक्षात घ्यायला हवं. एकूण काय, तर योग्य वयात मुलांना शाळेत घातलं तर मुलं शाळा एन्जॉय करतील. अवेळी आलेला पाऊस जसं काही रुजवत-मुरवत नाही उलट नुकसानच करतो तसंच अवेळी शाळेत जाणार्‍या मुलांच्या कोवळ्या मनावर अवेळी शाळेच्या बळजबरीचे ओरखडे उमटल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीची बालवाडी मुळात बालवाड्या सुरू का झाल्या? याचा विचार कोणी केला आहे का? आता तर बालवाय़ांमधून मुलांचे खेळ कमी आणि शिकणं जास्त होतं. पूर्वीच्या बालवाड्या आणि आताच्या बालवाड्या यात आता बराच फरक पडलाय. बालवाडीसाठी शब्द होता ‘के.जी.’ म्हणजेच ‘किंडरगार्टन.’ या केजीचा जनक फ्रेडारिक फ्रोबेल. त्यांच्या नजरेसमोरचं किंडरगार्टन काही वेगळंच होतं. किंडरगार्टन म्हणजे मुलांची बाग. मुलांनी इथे येऊन बुद्धीला चालना देणारे खेळ खेळावेत अशी त्यांची योजना होती. त्यासाठी फ्रोबेलनं वयानुसार खेळणी तयार केली होती. त्यात प्रामुख्यानं चेंडूचा वापर केला होता. विविध प्रकारचे चेंडूचे खेळ त्यांनी शोधून काढले होते. मुलं चेंडू खेळण्यातून खूप काही शिकतील, असं त्यांना वाटत होतं. फ्रोबेलनंतर पेस्टॉलॉजी या मानसशास्त्नज्ञानंही फ्रोबेलप्रमाणेच आपली बालवाडी चालवली. फ्रोबेल यांच्या मूळ कल्पनांना त्यांनी धक्का लावला नाही. यानंतर मुख्य आणि आपल्याला माहीत असलेलं नाव येतं ते ‘मॉन्टेसरी’चं. मॉन्टेसरी मॅडम यांना वाटायचं की, मुलांच्या बुद्धीला योग्य प्रकारे चालना देण्याचं हेच वय आहे. मुलं खेळ खेळण्यातून काही नवं शिकतील हे त्यांनी बघितलं. खेळताना मुला-मुलींना आवर्जून स्वातंत्र्य दिलं. सगळ्या मुलांना एका वेळी एकाच प्रकारचा खेळ खेळायचा असेल असं नाही. त्या क्षणाला जे खेळायचं आहे ते त्यानं निवडणं, त्याला वाटेल तितका वेळ त्यानं ते खेळणं आणि खेळून झाल्यावर जागेवर ठेवणं यातून खेळ, अभ्यास, शिस्त लागेल हे त्यांनी बघितलं. यातलं महत्त्वाचं काय तर, या तिघांनीही ‘मुलांचं वय लक्षात घेऊन खेळ’ हाच महत्त्वाचा मुद्दा मानला. खेळातून बुद्धीचा विकास होईल हे बघितलं. आताची बालवाडी पूर्वीच्या बालवाडीच्या तत्त्वाशी तुलना करता आजच्या बालवाड्यांमध्ये काय दिसतं? तर बुद्धिविकासाच्या दृष्टीनं पूर्ण विरोधी असणारं लेखन, वाचन, पाठांतर असा चक्क ‘अभ्यास’च शाळाशाळांमध्ये सुरू झाला आहे. या अभ्यासामुळे मुलं लवकर लवकर शिकतील, लवकर पुढे जातील, स्पर्धेत पुढे राहतील असं पालकांना वाटतं, पण होतं ते नेमकं याच्या उलट. लवकर, नकळत्या वयात शाळेत टाकल्यामुळे ते शाळेलाही लवकरच कंटाळणार आहेत. म्हणजे जे आई-बाबांना हवंय, त्याच्या नेमकं उलट होण्याची शक्यता. कारण चार ते सहा ही बालवाडीत जाऊन खेळायची वर्षं आहेत. सहा वर्षं पूर्ण झाली की पहिलीत प्रवेश घ्यायचा. ही पद्धत योग्य आहे. कारण या वयात मूल आपल्या विश्‍वातून थोडंसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचं सामाजीकरण होण्याची प्रक्रि या चालू असते. मुद्दाम शाळेत घातलं नाही तरी मित्न-मैत्रिणींकडे ओढा वाढणार असतो. बाहेरच्या वातावरणात जाऊन छोटे खेळ खेळणं आवडणार असतं. आपल्या नेहमीच्या सवयीच्या भाषेतली गाणी साभिनय म्हणणं, गोष्टी ऐकणं यातला रस वाढणार असतो. त्या नेमक्या वयात त्याच्यासमोर अतिशय आनंदाच्या वातावरणात बुद्धीला चालना देणारं जर काही ठेवलं तर त्याच्या मेंदूत सकारात्मक बदल घडतील. घरापेक्षा वेगळ्य़ा ठिकाणी, पण आनंदी वातावरणामुळे त्याच्या मनावर अन् भावनांवरही चांगले परिणाम होतील. ‘स्वार्थी’? - आई? राध्याच्या शाळेचं कसं होणार बाई आता? - असा प्रश्न पडला असेल का ऐश्‍वर्या रायला? ‘ऐश्‍वर्या ढुंढ रही है आराध्या के लिए स्कूल’ अशा ब्रेकिंग न्यूज आपण मध्यतंरी टीव्हीवर पाहिल्या. हे कमीच म्हणून त्यात असाही उल्लेख होता की, शिल्पा शेट्टीचा मुलगा विवानही आता शाळेत जायला लागला. (म्हणून तर तिला डान्स शो, आयपीएलसाठी वेळ मिळतो म्हणे.) आणि. आपल्या आमीर खानची बायको किरण, मोठी दिग्दर्शिका. तिचा मुलगा आझादही झाला की, दीड वर्षाचा. तोही आता जायला लागला शाळेत. (त्यामुळे आता किरणला वेळ मिळणार आणि ती पुन्हा झडझडून कामाला लागणार असल्याचे कळते-समजते. टीव्हीच्या बातम्यांवरून.) मग आराध्या तर दोन वर्षाची होईल नोव्हेंबरात. अजून ती शाळेत जात नाही, मागे तर नाही पडणार ती इतरांच्या तुलनेत? - असं वाटत असेल का आजी-आजोबा बच्चन, बाबा बच्चन आणि आई बच्चनला.? - त्यांना काय वाटत असेल ते त्यांचं ते जाणोत. पण आपल्यातल्या सामान्य आया.? त्यांना सगळ्याची घाई. साधारण एकाचवेळी झाली बाळंतपणं तर, झालीच स्पर्धा सुरू. तिचं मूल पालथं पडतं आपलं अजून नाही, अमकीचं बाळ सहाव्या महिन्यातच बसायला लागलं, तमकीचं चौथ्यातच सरकायला लागलं. धड मान धरता येत नाही त्या बाळांना स्वत:ची, पण इकडे आयांची स्पर्धा सुरू. काही ‘शहाण्या आणि जागरूक’ आया तर इंटरनेटवर ऑनलाइन मुलांच्या प्रगतीचे ‘माईलस्टोन’ तपासत आपल्या बाळाला जन्मत:च जागतिक स्पर्धेत उभं करतात, वजन-उंची-अँक्टिव्हिटीची जागतिक स्पर्धाच सुरू करून टाकतात. मूल मोठं व्हायला लागतं तशी स्पर्धा वाढते आणि जेमतेम दीड वर्षाच्या मुलासाठी शाळेचा शोधही सुरू होतो. ‘पटापट शिकेल गं सगळं आणि तेवढाच दोन तास आराम आपल्याही जीवाला.’ असं म्हणत मूल दीड वर्षाचं झालं की टाकतात त्याला एखाद्या इंग्रजी ‘प्ले स्कूल’मध्ये. लगेच सुरू स्टँडिंग लाइन-स्लिपिंग लाइनची स्पर्धा. वह्या-पुस्तकं-युनिफॉर्मचं ओझं आणि ते घेऊन व्हॅनमध्ये बळजबरी कोंबलेलं, भेदरलेलं-भोकाड पसरलेलं मूल. इतर आयांच्या तुलनेत आपण पुढं राहावं. आपलं मूल आपलं ‘प्रगतिपुस्तक’ बनावं. आणि त्यासाठी त्या बाळानं करावी सुरुवात स्वत:ला सिद्ध करायला. एवढी ‘स्वार्थी’ असते आई.? विचारावं स्वत:ला आपणच.! डॉ.श्रुती पानसे

६ डिसेंबर, २०१२

संस्कार.......एक द्विधा ??

संस्काराचं बाळकडू .. बालपणीच पाजलेले.. आज मात्र समाजात, संस्काराचे "बारा" वाजलेले.. समाजात फिरताना जाणवतो, संगतीचा भारी पगडा... इकडेच सुरु होतो, 'संस्कार - संगत' झगडा.. मौल्यवान शिक्षणाचे सध्याचे.. समाजातले "दर" पाहून, 'डॉक्टर' , 'इंजिनिअर' अशा "सेवाभावी" इच्छा.. मनातच जातात राहून.,, आजचे "कॉर्पोरेट विश्व" म्हणजे.. संस्कार जपण्याची बॉर्डर, कारण क्वालिटी डावलून, "बार" मध्ये साईन होतात पर्चेस ऑर्डर.. विवाह संस्था ह्या पवित्र प्रथेचे.. बदललेले इक्वेशन.....म्हणजेच स्वातंत्र्याच्या "स्पेस" साठी... सजवलेले "लिव इन रिलेशन" अनेक उदाहरणे देऊन गायली जाते... नारी शक्तीची गाथा, सोयीनुसार संस्कारांना डावलून रुजवली जात आहे...."स्त्री-भ्रूण" हत्येची प्रथा.. "मोठा झाल्यावर नक्की सांभाळेन..." ही बालपणीच्या संस्काराची भाषा.. अर्थार्जनाच्या हव्यासापोटी पालकांना दाखवते.. एकटेपणा अथवा वृद्धाश्रमाची दिशा.. समाजातल्या अशा विरोधाभासाने, होऊन देऊ नका स्वतःची "द्विधा".. बुद्धीचा कस पणाला लावून.. विचारांचा सुवर्णमध्य साधा.
चांगले संस्कार आणि स्वतःचे विचार यांचा अचूकपणे घाला मेळ... आनंदाने जीवन जगण्याचा, मग रंगात येईल खेळ..

२७ नोव्हेंबर, २०१२

तुम्ही, मी, आपण सारे सुजाण पालक....

आहाहा! लेखाचं शीर्षकच कसं कानाला गोड वाटतं!- -प्रा. रमेश सप्रे पण ते अर्धवट आहे...पुढे जे शब्द आहेत ते मनाला कसे वाटतात पहा.....‘आहोत का? (सुजाण पालक आहोत का?) नसू तर कसे होऊ?’ असे ते शब्द, खरं तर, प्रश्‍न आहेत. आजचा हा आपणा सर्वांच्या दृष्टीनं जिवंत नि जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्याविषयी अनेक पालक-शिक्षक संघांच्या बैठकांतून प्रश्‍न विचारले जातात. या प्रश्‍नांच्या मुळाशी मुलांचं वर्तन, अभ्यास यामुळे बिघडलेलं कौटुंबिक आरोग्य असतं. पण वाटते तेवढी ही परिस्थिती गंभीर नाही. आपण पालकांनी थोडं अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे. ‘सुजाण पालकत्व’ (वाइज पेरेंटिंग) ही कल्पना अलीकडच्या काळातील आहे अन् ती महत्त्वाची आहे. ‘जाण’ शब्दात जाणणे, जाणता, जाणीव अशा अर्थांच्या छटा आहेत. आपल्याला मुलांच्या मनाची(मानसिकतेची) खरी जाणीव आहे का? मुलांची मनं सदा प्रसन्न राहावीत यासाठी करायच्या उपायांची आपल्याला जाण आहे का? आपण आई-वडील झालो खरे पण ‘परिपक्व, जाणते पालक’ झालो का? हा खरा प्रश्‍न आहे. म्हणतात ना, आई-वडील होणं सोपं आहे, ‘पालक’ होणं अवघड आहे. पशुपक्षी सारे आई-वडील बनतात पण पालक नाही बनू शकत कारण त्यासाठी आवश्यक ती बुद्धी, विचारशक्ती म्हणजेच ‘जाण नि जाणीव’ त्यांच्याकडे नसते. प्रा. राईलकर हे गणिताचे प्रसिद्ध शिक्षक. त्यांना सरकारनं पाहणी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यास -विषयक परिस्थितीबद्दल सूचना करणारा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या अहवालाचं नावच आहे, ‘पालकांनी चालवलेला मुलांचा छळवाद’. यात दोन मुख्य मुद्दे म्हणजे मुलांवर आरंभापासून पालकांनी लादलेलं इंग्रजी माध्यम आणि त्यांच्यावर लादलेलं अवास्तव अपेक्षांचं ओझं. एकूण बोजा वाहणार्‍या गाढवासारखी अवस्था मुलांची होते म्हणून ‘छळवाद’ हा शब्द वापरलाय. असो. ‘बालभवन’ म्हणजे मुलांसाठी नंदनवन. शाळा सोडून उरलेल्या वेळात मुलं इथं निरनिराळ्या कला शिकायला, छंदांचा विकास करायला, आनंदात नाचायला, गायला, बागडायला जमतात. गोव्यातही शहरी व ग्रामीण भागात अशी अनेक ‘बालभवनं’ आहेत. महाराष्ट्रातील ‘बालभवन’च्या संचालिका शोभा भागवत या चांगल्या लेखिकाही आहेत. मुलांचं शिक्षण, पालकांच्या अडचणी, सुजाण पालकत्व अशा विषयावर चिंतन व निरीक्षण करून त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांच्या एका लेखाचं नावच बरंच काही सांगून जातं. - ‘पालकांना, शहाणपण देगा देवा!’...मुख्य विचार अर्थातच शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स-ग्रेड्‌स-रँक्स-पर्सेंटेज एवढाच उद्देश समोर ठेवणारे अनेक पालक असतात. त्यांना आपण आपल्या मुलांचं ‘मार्क्स मिळवणारं यंत्र’ बनवताना त्यांचं कधीही परत न येणारं लहानपण हिरावून घेतोय याची जाणीव नसते. हे कसले ‘सुजाण पालक!’ पालकत्वाचा सर्वांगीण विचार करणारी(ए टू झेड ऑफ पेरेंटिंग) अनेक पुस्तकं मिळतात. ‘जडण-घडण’, ‘पालक-नीती’, गोव्यातील विद्याभारती -कडून प्रकाशित होणारं ‘पालक मित्र’ अशी अनेक नियतकालिकं आपापल्या परीनं ‘सुजाण पालकत्वासाठी मार्गदर्शन करत असतातच. आपणही थोडं याच दिशेनं सहचिंतन करू या.- शाळेत पालकांना संबोेधित करण्यासाठी बोलवतात तेव्हा एक नेहमीचा विषय असतो - ‘मुलांच्या शिक्षणात किंवा व्यक्तिमत्त्व विकासात पालकांचा सहभाग(पार्टिसिपेशन) किंवा पालकांची भूमिका (रोल ऑफ पेरेंट्‌स). शहरातील व ग्रामीण भागातील पालकांच्या बर्‍याच अडचणी समान असल्या तरी काही निराळ्या निश्‍चित असतात. अशा सभांना पालकांना बोलावणं हे रुटीन कर्मकांड असतं. पण पालकांनी येणं किंवा त्यांना आणणं हे त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचं काम असतं. हल्ली पालकांना जाणीव होऊ लागलीय त्यामुळे पूर्वीपेक्षा खूपच चांगली उपस्थिती अशा बैठकांना असते. मुलांचा अभ्यास, सवयी, वागणं याविषयी नुसत्या तक्रारी करून भागणार नाही हे आता बहुतेक पालकांना पटलंय. त्याबरोबरच नुसता शिक्षकांवर सर्व भार टाकणं किंवा सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना जबाबदार धरणं हेही योग्य नाही याची जाणीवही पालकांना अधिकाधिक होऊ लागलीय. हे मुलांच्या जीवनाच्या दृष्टीनं शुभचिन्ह आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांच्या पालक-शिक्षक संघांच्या माध्यमातून पालकांसाठी विविध विषयांवर उद्बोधन वर्ग, तज्ज्ञांची व्याख्यानं व प्रश्‍नोत्तरं सत्रं असे कार्यक्रम सादर होऊ लागले आहेत. ही अत्यंत आवश्यक व आशादायी घटना आहे. पालकांनी अधिकाधिक संख्येनं व सकारात्मक मनोवृत्तीनं यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि हे सारं करताना मनात ‘मुलांचं हित’ हाच मुद्दा असला पाहिजे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे दिवसाचे सक्रिय १२ तास पालक मुलांपासून दूर असणारी बहुसंख्य उदाहरणं आहेत. मुलांचं दुपारचं जेवण, थोडी विश्रांती, सकस मनोरंजन, गृहपाठादी अभ्यास, मित्रमैत्रिणींशी फोनवरून बोलणं, वृत्तपत्रादींचं थोडं वाचन अशा अनेक बाबींकडे पालक लक्ष देऊच शकत नाहीत. व लक्ष देण्यासाठी ठेवलेले नोकर-चाकर याबाबतीत विशेष काही करू शकत नाहीत. हे खरं कारण आहे जे पालकत्वाच्या निरोगी विकासाच्या आड येतं. पालकांनी संस्कार केव्हा घडवायचे - संध्याकाळी, रात्री की सुटीच्या दिवशी? असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो. याच्यावर प्रभावी उपाय आहे का याचा विचार आता करू या. मुलं हे आपल्या जीवनाचा प्राण आहेत हे पालकांना सांगावं किंवा शिकवावं लागत नाही. पण ‘मुलं’ही आपल्या दैनंदिन व एकूण जीवनाची प्राथमिकता किंवा अग्रक्रम(प्रायॉरिटी) आहे का? ...हा प्रश्‍न विचारात टाकणारा आहे. इतर अनेक कटकटी आपल्या मागे असतात हे खरं आहे. पण हेही सत्य आहे की अनेक अनावश्यक कटकटी आपण आपल्या मागे लावून घेतो आणि त्यामुळे मुलांसाठी वेळच उरत नाही. नाहीतरी आपली एकूणच जीवनपद्धती स्वकेंद्री (सेल्फ सेंटर्ड) होऊ लागलीय. कळत नकळत र्आपल्या अनेक कृतींचा फोकस आपल्या स्वतःच्या सुखसोयींवर, आरामसुविधांवर असतो. त्याप्रमाणात कुुटुंबासाठी, मुलांसाठी वेळ व शक्ती कमी राहते. परिणाम मुलांच्या वागण्यामुळे व अभ्यासाच्या परिस्थितीमुळे सर्वांच्या मनावर सदैव ताण राहतो जो कौटुंबिक शांतिसमाधानाला आणखी मारक असतो. हे दुष्टचक्र भेदलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? वेळेचं नियोजन(टाइम मॅनेजमेंट) जरा काटेकोरपणे करून त्यात मुलांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. सर्वप्रथम व सर्वांत शेवटी अधिकाधिक वेळ मुलांसाठी ठेवलाच पाहिजे. सुदैवानं हल्ली कुटुंबात मुलं कमीच(बहुतेक कुटुंबात एकच) असतात. त्यामुळे लक्ष देणं अवघड नसतं पण विशिष्ट वेळ यासाठी राखून ठेवावाच लागतो. काम करणार्‍या पालकांना मुलं सर्वसाधारणपणे सायंकाळीच भेटतात. त्यावेळपर्यंत दिवसभराच्या कष्टानं, केलेल्या वणवणीमुळे शरीर थकून जातं. पण मनाचा उत्साह कायम ठेवला तर मुलांसाठी आवश्यक ती ऊर्जा राखून ठेवता येते. ती ठेवलीच पाहिजे. शिक्षणाशिवायही मुलांचं जग व जीवन आहे हे पक्कं ठरवलं पाहिजे. शिक्षण कमी महत्त्वाचं नाही पण मुलांबरोबरचं आपलं ‘सहजीवन’ अभ्यास, गृहपाठ, क्लासेस, शिकवण्या यामुळे झाकोळून जाणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. आठवड्याच्या शेवटी(वीकेंड) मुलांबरोबरच राहण्याच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. हे करताना मुलांच्या मनाचा कल लक्षात ठेवायला हवा याचं भान ठेवलं पाहिजे. घरातील साध्या साध्या गोष्टीत जी निर्णय घेण्याची प्रक्रिया(डिसिजन मेकिंग) असते त्यात मुलांचा मार्गदर्शित सहभाग (गाइडेड पार्टिसिपेन) असला पाहिजे. मुलांबरोबर गप्पागोष्टी करण्यासाठी, काव्यशास्त्र विनोदासाठी खास वेळ रोज काढून ठेवला पाहिजे. मुलं मोठी होत जातील तशा अनेक मर्यादा या गोष्टींवर पडतील. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या मित्रमंडळाचा (पीअर ग्रुप्स) त्यांच्या अनेक सवयी, निर्णय, आवडीनावडी यावर व एकूणच वर्तनावर खूप प्रभाव किंवा दबाव(पीअर प्रेशर) असतो ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. हल्लीच्या जीवनपद्धतीत वाढत्या वयाच्या मुलामुलींच्या मनावर तर शिक्षक-पालक-इतर वडील मंडळी यांच्यापेक्षा हा प्रभाव अधिक असतो. आईवडिलांनी आपला प्रभाव प्रेम, आपुलकी, कर्तव्यपालन यातून सतत जागता व जिवंत ठेवायला हवा. लहानपणापासून मुलांच्या भावजगताशी व कल्पना किंवा विचार विश्‍वाशी प्रेमानं जोडलेलं राहणं यासाठी अत्यावश्यक आहे. प्रेमानं जाणीवपूर्वक केलेला स्पर्श हा यासाठी जिवंत सेतु आहे. अजून खूप गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळी बघू. एक लक्षात ठेवू या - मुलांची स्वतंत्र व्यक्तिमत्वं असतात. त्यांना गृहीत न धरता त्यांचं हित साधण्याचा संकल्प करू या.

८ मे, २०१२

काही सत्य पालकांसाठी

"आपल्या श्वासोच्छवासापासून आपल्या सगळ्या भावभावना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या वाडीतले काही टप्पे पाह्रच रंजक आहेत .ज्या मुलांचे पालक/शिक्षक त्यांना मोठ्यादा गाणी /गोष्टी म्हणून /वाचून दाखवतात आणि तसचं त्याच्यांशी सतत संवाद साधतात त्या मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होतो . मुल भाषा कशी शिकत आणि त्यात मेंदूची भूमिका काय असते हे तपासायचं ठरवल तर वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जी मुला किमान दोन भाषा शिकतात त्या मुलांच्या मेंदूची रचना एकच भाषा शिकणाऱ्या मुलांच्या मेंदू पेक्षा थोडी वेगळी असते. ज्या मुलांना लहानपणी ताणतणाव भांडण असे वातावरण अनुभवायला लागत त्या मुलांची अध्ययन क्षमता कमी होते . तसेच लहानपणी आपल्या घरात मुलांना प्रोत्साहीत करणारे वातावरण असेल तर शिकण्याची क्षमता २५% नं जास्त वाढते अस संशोधनान सिद्ध झालय." तेव्हा सुजाण पालक हो आता तरी आपल्यला जागे व्हायलाच हवे, लहान मुला / मुली समोर काय बोलावे काय टाळावे ह्याचा बोध व्हायला हवा तसेच जेव्हडं जमेल तसं आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्या पाल्याशी संवाद साधुयात.